अफजलखानाच्या बायकांची 'साठ' कबर

अफजलखानाने आपल्याच त्रेसष्ठ बायकांना मारल्याची गोष्टआपणास थोडी चमत्कारिक वाटते व अफजलखानाच्या बायकांच्या कबरी प्रत्यक्ष पाहताना व माहिती ऐकतानाही त्यांच्या खरेपणाबद्दल कोणाकोणाचे मन साशंक होऊ शकते.





परंतु अनेक बखरकारांनी ही माहिती सांगितले आहे. इतकेच नव्हे तर त्यावेळच्या अबे कॅरे नावाच्या एका फ्रेंच प्रवाशाने अफजलखानाने आपल्या त्रेसष्ठ बायका मारल्याचा उल्लेखही आपल्या ग्रंथात केला आहे.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृत्यांना पायबंद कसा घालायचा याची चर्चा विजापूरी दरबारात चालली असता "शिवाजी म्हणजे काय बिशाद, चढे घोड्यानिशी जिवंत कैद करून घेऊन येतो" या अफजल खानाच्या उद्गाराने पातशाहजादी व विजापूरच्या दरबारात जमलेले अमीर-उमराव सर्व खुश झाले. परंतु हे काम बोलण्याइतके सोपे नव्हते, हे स्वतः अफजल खान जाणून होता.


"बोल बोलता वाटे सोपे, करणी करता टीर फाटे" अशी अफजलखानाची गत होऊन गेली. सेनापती पदाचे अधिकार व छत्रपति शिवाजी महाराजांना मारून अथवा कैद करून आणण्याविषयीचे फर्मान मिळाल्यानंतर थोड्याच दिवसात अफजलखान वाईकडे यावयास निघाला.


अफजलखान



विजापुराहून निघण्यापूर्वी अफजलखानाचा कोणी अवलिया फकीर नावाचा त्यांचा गुरु होता. त्याच्या दर्शनात हा अफजलखान प्रथम गेला. या अवलियाने निघण्याविषयी आशीर्वाद देताना यात तुझे अनिष्ट होईल असे निक्षून सांगितले. यामुळे अफजलखानाचा धीर बराच खचला. परंतु काही झाले तरी या कामात माघार घ्यावयाची नाही. हर एक उपाय करून बडे साहेबीणीने आपणावर सोपवलेले हे काम तडीस न्यावयाचे हाच विचार त्याचा कायम होता. किंबहुना हे काम आता सोडणे त्याच्या इभ्रतीस फार अपायकारक होते. त्यामुळे तो बिल्कुल कसूर न करता निर्वाणीचे उपाययोजना करू लागला.


अफजलखान एवढ्या प्रचंड सिद्धतेनिशी व एवढ्या विशाल सैन्यासागरानिशी निघाला, तो त्याने विजापूर पासून दोन कोस छावणी टाकली. निघताना त्याला नाना प्रकारचे अपशकून झाले. त्याचा फत्ते लष्कर नावाचा हत्ती त्यावेळेस मेला. त्या घटनेचा त्याच्या मनावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून सुलतानाने आपला बिनीचा हत्ती त्याला भेट पाठविला. अज्ञानदास शाहीर आपल्या पोवाड्यात म्हणतो -


खान कटबंद केला | कोटा बाहेर डेरा दिला ||

मोठा अपशकून जाहला | फत्या लसकरा हत्ती मेला ||

खबर गेली बाच्छायाला | बिनीचा हत्ती पाठविला ||

बारा हजार घोडा | अब्दुलखानालागी दिला ||


अफजलखान अपशकुन मानण्याइतका कातर ह्रदयाचा नसला तरी गाठ कोणाची आहे हे ओळखून त्याने कच खाल्ली होतीच. मृत्यू समोर दिसतो असे म्हणतात तशीच त्याची अवस्था झाली. स्वारीवर निघताना आपल्याला मृत्यू आला तर मुसलमानी प्रथेप्रमाणे आपल्या बायकांनी दुसरे विवाह करू नयेत म्हणून खानाने आपल्या त्रेसष्ठ बायकांचा शिरच्छेद केला असे सांगण्यात येते.


अबे कॅरे नावाचा फ्रेंच प्रवासी सन १६६३ मध्ये खानाचे अफजलपुरचे निवासस्थान पाहावयास गेला होता. तेव्हा तो आपल्या प्रवास वृत्तांतात लिहितो,


"When Abdul Khan was about to depart and when he had to quit his woman, his jealousy flamed up with such violence that he could not master it anymore, and it inspired him with the darkest design of which a man is capable. He shut himself up for eight days in his sereglio, passing all the time in festivity and pleasure. The end was tragic, because on the last day, to save all the disquiet which love offers, he cause to be stabbed before him the 200 unfortunate woman, who did not expect in the least to receive such a treatment." (Foreign Biographies of Shivaji, Vol I)


याचा अर्थ असा-


"ज्यावेळी अफजलखानाची निघण्याची सारी सिद्धता झाली, आणि आपल्या स्त्रियांचा निरोप घेण्याची वेळ आली तेव्हा मत्सराग्नीनेने त्याच्या मनात इतका विलक्षण पेट घेतला की, तो त्याला आवरता येईना. त्या वेडाच्या उन्मादात त्याला असे कृत्य करण्याची प्रेरणा झाली की जे केवळ मत्सरी मनुष्य करू शकतो. अफजलखानाने आठ दिवस स्वतःला अंतःपुरात कोंडून घेतले आणि हा सारा वेळ त्याने चैन व उपभोग यात घालविला. पण त्याचा शेवट मात्र अत्यंत कारुण्यपूर्ण व भयानक होता. शेवटच्या दिवशी त्याने आपल्या डोळ्यासमोर त्याच्या सुखाचे साधन असलेल्या दोनशे दुर्दैवी स्त्रियांना ठार मारविले. त्या बिचार्‍यांना आपल्यावर हा प्रसंग येईल अशी स्वप्नातही कल्पना नसेल."


या गोष्टीवर भाष्य करताना इतिहासकार सर जदुनाथ सरकार लिहितात,


"अफजलखानाविषयी अनेक दंतकथा प्रचलित आहेत. अर्थात या त्याच्या मृत्यूनंतर निघालेल्या असाव्यात. खुद्द त्याच्या अफजलपूर गावी सुद्धा पुढील विलक्षण दंतकथा प्रसिद्ध आहे. - तो जेव्हा स्वारीवर निघाला तेव्हा त्याला आपले भविष्य दिसू लागले की या सार्‍यातून आपण सुखरूप परत येणार नाही. म्हणून त्याने निघण्यापूर्वी आपल्या जनानखान्यातील त्रेसष्ठ बिब्यांना ठार मारून टाकले व सारख्या आकाराची त्यांची थडगी बांधली. ही थडगी अद्द्यापि अफजलपुर या गावी दिसतात. या कथेत कितपत तथ्य असेल हे सांगणे दुष्कर आहे. तथापि थडगी तेथे आहेत एवढे मात्र खरे. हल्ली ही जागा अगदी ओसाड पडली आहे. तेथे त्याचा राजवाडा पूर्वी होता, तेथे आता दाट जंगल उगवलेले असून माणसांनी गजबजलेले ती जागा आता अगदी निर्मनुष्य अशी झालेली आहे. इमारतीचे अवशेष मात्र तिथे आजही दिसतात. स्वारीत अपयश येऊन आपण प्राणास मुकलो तर या स्त्रियांनी परपुरुषांशी रत होऊ नये, या विचाराने अफजलखानाने त्यांचा शिरच्छेद आपल्या समक्ष कळविला होता, असे हा फ्रेंच प्रवासी लिहितो. मानवी असूया काय न करेल हे सांगणे कठीण आहे." (शिवाजी आणि शिवकाल)


तात्पर्य राक्षसी शरिरासारखे राक्षसी अंतःकरणही अफजलखानाला लाभले होते एवढे मात्र खरे!


साठ कबर



अफजलखानाच्या या भेसूर व हिडश्या कृत्याची ही जागा अजूनही गावकरी लोक विजापूर जवळील अफजलपुर गावी दाखवतात. तेथे या सर्व बायकांच्या शरीरास मूठमाती देऊन त्या सर्वांच्या एकासारखे एक अशा एकाच काळी बांधलेल्या त्रेसष्ठ कबरी अजूनही या गोष्टीची साक्ष देत आहेत.


संदर्भ -

(१) वि.ल.भावे, अफजलखानाचा वध

(२) जदुनाथ सरकार, शिवाजी व शिवकाल

(३) Foreign Biographies of Shivaji, Vol I


Comments

Popular posts from this blog

अष्टप्रधानांची कामे व कर्तव्ये